Sunday, May 28, 2006

तळवलकरांच्या लेखाचे निमित्त

आज म. टा. मधे गोविंद तळवलकरांचा लेख आला आहे. पहिल्या पानावर. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1581098.cms
बाकी संपूर्ण अंकात वाचण्यासारखे काहीही नाही. तळवलकर लिहीतात, हे सरकार सोनियांनी बरखास्त करुन टाकावे. लेखातील मुद्यांशी असहमत होण्यासारखे काही नाही. परिस्थिती वाईट आहेच. परंतु, सत्ताबदल हेच याचे उत्तर आहे काय? विलासराव देशमुख यांच्यात काही करुन दाखवण्याची इच्छा आणि धमक दिसत नाही. सेना -भाजप कसे बसे टिकून आहेत. समर्थ राजकीय नेतृत्व एकही नाही. तेव्हा सरकार बरखास्तीने काय साध्य होणार नाही. तळवलकरांचा उद्वेग समजण्यासारखा आहे. पण त्यावर उपाय काय हे मात्र कळत नाही.
जानेवारीपासून ३६० शेतकरी आत्महत्या करतात आणि विधान परीषदेत प्रमोद नवलकर चर्चा करतात fashion show मधील wardrobe malfunction वर आणि मागणी करतात त्याची पोलिस चौकशी करण्याची. या मृत्यूंपेक्षा, त्यावर सरकारला काही कृती करण्यास भाग पाडण्यापेक्षा, नवलकरांनी मांडलेले विषय अधिक महत्वाचे आहेत का? विरोधकांचे काम सरकारला पाडायचा प्रयत्न करणे, संधी मिळाली की कशावरुनही सरकारला कोंडीत पकडणे हे नसून, सरकारकडून योग्य प्रकारे समस्या सोडविल्या जात आहेत की नाहीत हे पाहणे असावे असे यांना वाटत नसावे.
यास माध्यमेही जबाबदार आहेत. "अभिषेक-ऐश्वर्या कुंडलियाँ मिली" ही यांची breaking news. जर शेतकर्यांच्या समस्या, आत्महत्या या बातम्या मुख्य नसतील,त्यांना बातमीपत्रांत जागाच नसेल, तर लोकांना त्या कळणार कशा? सरकारला त्यासाठी जाब कोण विचारणार? da vinci code ला विरोध आणि फना गुजरातेत प्रदर्शित होत नाहीत या मुख्य बातम्या आणि मृत्यूंचे उल्लेखही नाहीत. प्रसिद्धीलोलूप लोकप्रतिनिधी तरी कशाला या मुद्दांवर बोलतील? तसे मृत्यूंचेही उल्लेख होतात. कोणी एक नफिसा जोसेफ नावाची मॉडेल आत्महत्या करते, त्याची चर्चा चालते आठवडाभर. त्या बातमीच्या निमित्ताने अजून काही celebrities च्या प्रतिक्रिया दाखवता येतात, तिच्या खाजगी आयुष्याचे वाभाडे काढता येतात आणि वाहिनीचा TRP वाढवता येतो. Times group च्या जैन मंडळींना तर क्षमाच नाही. TOI चे म. टा. चे tabloid बनवून ठेवले आहे.( म. टा. तील मराठी तर वाचवत नाही. पुढील वाक्य पहा:- 'विजया चौक नावाचे झंझावात शांत झाले'. यंव रे पठ्ठे! तो झन्झावात नाही, ते झन्झावात ? आणि हे अपवादात्मक उदाहरण नाही.दररोज अशी भरपूर वाक्ये असतात. बिघडलेली भाषा हा एका सर्वस्वी वेगळ्या लेखाचा विषय होईल.)
मुंबई सारख्या ठिकाणी रस्ते, सांडपाणी निचरा,पाणीपुरवठा या basic infrastructure (याला मराठी शब्द काय?) ची दयनीय स्थिती असताना , शिक्षण क्षेत्रात बजबजपुरी माजलेली असताना (आरक्षणाविषयी बोलत नाही आहे. अभियांत्रिकीचे प्राध्यापक पहा. विशेषकरुन संगणक विभागचे. आहा, धन्य ते शिक्षक जे screensaver ची print-out काढून आणायला सांगतात.) कोणत्या प्रगतीच्या गप्पा आपण मारतो कळत नाही.

2 Comments:

Blogger Parag said...

test

Sunday, May 28, 2006  
Blogger Mandar Behere said...

अगदी खरे आहे तू जे काही लिहीले आहेस ते.

- मंदार

Sunday, May 28, 2006  

Post a Comment

<< Home